काकडा’ भजन जिव–शिव ऐक्य साधण्याचे साधन : ह.भ.प. चंद्रकांत महाराज लाठकर.

नायगाव :

भगवंताच्या उपासनेची अनेक साधने आहेत. त्यापैकी काकडा भजन हे पहाटेच्या प्रहरात केले जाणारे अत्यंत प्रभावी साधन असून, अंतःकरणातील भक्ती जागृत करून नामस्मरणाद्वारे जिव–शिव ऐक्य साधण्याचा हा उत्तम मार्ग असल्याचे ह.भ.प. चंद्रकांत महाराज लाठकर यांनी प्रवचनातून सांगितले.                                              नायगाव बाजार येथील मार्केट यार्डमधील नवसाला पावणाऱ्या महादेव मंदिरात महिला मंडळांच्या वतीने चातुर्मास निमित्त दररोज पहाटे काकडा भजनाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाची सांगता मोठ्या उत्साहात करण्याचा संकल्प महिला मंडळाने केला होता. त्यानुसार रविवारी (दि. ९) सकाळी दहा वाजता ह.भ.प. चंद्रकांत महाराज लाठकर यांच्या प्रवचन सेवेचे आयोजन करण्यात आले.                                                                  प्रवचनात महाराज म्हणाले, “काकडा का करावा, कोण करावा आणि त्याचे फलश्रुती काय आहे?” याबाबत त्यांनी सविस्तर विवेचन केले. भगवंताला ओवळण्यासाठी ज्योती वात, फुलवात, दोरवात आणि काकडा वात वापरली जाते. त्याद्वारे पहाटेच्या प्रहरात भगवंताला प्रश्न विचारून, भक्तीची जाणीव अंतःकरणात जागृत केली जाते,” असे त्यांनी सांगितले.                                                  कार्यक्रमादरम्यान महिला मंडळाच्या उपक्रमांचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले. परमार्थप्रेमी बाबुराव लंगडापुरे, वसंत माने, शंकर लाब्दे यांच्या मार्गदर्शनाखाली काकडा भजनाची सांगता संपन्न झाली. यावेळी महिलांनी छप्पन्न भोग महादेवास अर्पण केले.                उपजिल्हाधिकारी (मंत्रालय) शिवनंदा मलशेट्टे उर्फ लंगडापुरे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.    या कार्यक्रमात सुशिला चिद्रावार, सुमनबाई लंगडापुरे, कावेरी माने, सुनंदा लंगडापुरे यांच्यासह अनेक महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.