चिंब पावसान राने झाली आबादानी आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे.

कृषी वार्तापत्र  – जयकुमार अडकीने

माहूर- माहूर तालुक्यातील शेतकरी खरीप हंगामासाठी शेतीची मशागत करून पावसाची प्रतीक्षा करत होता. मान्सूनचा पाऊस लांबला होता. अनेक शेतकऱ्यांनी ज्यांच्याकडे सिंचन सुविधा उपलब्ध आहे त्यांनी धूळ पेरणी केली. परंतु सिंचन सुविधा उपलब्ध असूनही 10 जून रोजी झालेल्या वादळी वाऱ्याने कोसळलेले विद्युत खांब पुन्हा उभारण्याचे काम महावितरण कडून करण्यात आले नसल्याने अनेक शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली. अनेक शेतकऱ्यांची धूळ पेरणी वाया गेल्याने दुबार पेरणीचा आर्थिक फटका बसला. महिनाभरापासून बळीराजा मान्सूनची चातकासारखी वाट पाहत होता. परंतु मान्सून दडी मारून बसल्याने बळीराजाचा मित्र असलेला “पेर्ते व्हा” असा इशारा देणाऱ्या पक्षाचाही आवाज प्रचंड तापमानाने हैराण झाला असल्याने दबlल्या गेला होता.

आता मात्र दि. 25 जुन रोजी माहूर तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने बळीराजा प्रचंड सुखावला असून दरम्यानच्या तापमानाने गर्मीमुळे प्रचंड हैराण झालेल्या मानवी जीवासह झालेल्या पावसाने वातावरणात तापमानात घट झाल्याने सर्वसाधारण तापमान झाल्याने प्रचंड दिलासा मिळाला. असल्याने सगळीकडेच “ आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे” असे वातावरण पसरले आहे अखेर मान्सून सक्रिय झाल्याने शेतकरी वर्गासह संपूर्ण नागरिकांचा जीव भांड्यात पडला आहे.

शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त, शैक्षणिक सत्र सुरु झाल्याने विद्यार्थी, पालक व शिक्षक शैक्षणिक सत्रातील पुढील नियोजनात व्यस्त झाले आहेत. तर कृषी साहित्य विक्रेते व शालेय साहित्य विक्रेते झेरॉक्स व इतर सेवा व्यवसाय करणाऱ्या मंडळीकडे व पिक कर्जासाठी बँकांच्या दारी ग्राहकांची गर्दी दिसत असून वातावरणात गारवा निर्माण झाल्याने बाजारपेठेत ग्राहकांची रेलचेल वाढलेली दिसत आहे.

माहुर तालुक्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र ५१ हजार ६२५.६९हेक्टर असून पेरणी योग्य क्षेत्र ३४ हजार४०१.७३ हेक्टर आहे. तालुक्यातील चार महसूल मंडळा पैकी माहूर मंडळाचे भौगोलिक क्षेत्र १३ हजार ७१२ .९९ हेक्टर असून पेरणी योग्य क्षेत्र ८ हजार १२७.४० हेक्टर आहे.वाई मंडळाचे भौगोलिक क्षेत्र ९ हजार ७१.४६ हेक्टर असून पेरणी योग्य क्षेत्र ७ हजार ९८९.९३ हेक्टर आहे, वानोळा मंडळाचे भौगोलिक क्षेत्र १६ हजार २७४ .३८ हेक्टर असून पेरणी योग्य क्षेत्र ८ हजार ७००.६५ हेक्टर आहे, सिंदखेड मंडळाचे भौगोलिक क्षेत्र १२ हजार ५६६ .६९ हेक्टरअसून पेरणी योग्य क्षेत्र ९ हजार ५८३ .७५ हेक्टर आहे. यावर्षी ज्वारी ४०० हेक्टर, तूर ३हजार ६८३ हेक्टर उडीद ३६१ हेक्टर, मुग ३८६ हेक्टर सोयाबीन १० हजार २२४ हेक्टर, कापूस १८ हजार २५५ हेक्टर, हळद ४२३ हेक्टर व इतर ३६४ एक्कर असा एकूण ३४ हजार ५६ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकाचा पेरा होत असतो.