
सिद्धार्थ गजभारे कुंटुर
कुंटूर: शाॅर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत बंद असलेले घर जळून खाक झाल्याची घटना नायगाव तालुक्यातील कुंटूर येथे सोमवारी रात्री घडली. या घरातील कुटुंब कामानिमित्त बाहेरगाव राहत असल्याने सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र, आगीत घर जळाल्याने माेठे नुकसान झाले आहे. कुंटूर येथील दत्ता ग्यानोबा बोंबिलवार , केरबा ग्यानोबा बोंबिलवार,नारायण ग्यानोबा बोंबिलवार यांचे कौलारू घर आहे. बोंबिलवार यांचे सर्व कुटुंब ऊस तोडीच्या कामासाठी बाहेरगावी राहते. त्यामुळे हे घर बंद असते. सोमवारी रात्री १२ वाजण्याच्या दरम्यान अचानक घराला आग लागली. घरातून आगीचा धूर व ज्वाला दिसताच आजूबाजूच्या ग्रामस्थांनी धाव घेत आग आटाेक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, रौद्र रूप धारण केल्याने आगीवर नियंत्रण मिळविणे शक्य झाले नाही. त्यामुळे काही क्षणांत संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. यामध्ये घरातील रोख रक्कम ४० हजार रु सोन्या चांदी चे दागिने ,भांडीकुंडी, कपडे, अन्य साहित्य जळून खाक झाले.आगीबाबत ग्रामस्थांनी ग्रामसेवक ,तलाठी तसेच तहसीलदार यांना माहिती दिली. त्यानंतर कुंटूर चे रुपेश कुंटुरकर,ग्रामसेवक नागेश येरसनवाड,तलाठी मुदळे ,सरपंच प्रतिनिधी मारोती कदम, व उपसरपंच शिवाजी होळकर यांच्या उपस्थितीत तलाठी साहेबांनी पंचनाम केला असल्याची माहिती मिळाली . बोंबीलवार यांचे सर्व घर जळून खाक होऊन त्यांच्या जीवन उपयोगी सर्व वस्तू जळून खाक झाल्यामुळे रुपेश देशमुख कुंटुरकर यांनी त्यांना तात्पुरती लागणारी जीवन उपयोगी साहित्य घेऊन दिले…

