
्माहूर : जयकुमार अडकिने
माहूर ते सारखणी राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या उमरा येथे आनंदगीर फार्मर प्रोड्यूसर या कंपनीचे उदघाट्न आ. भीमराव केराम यांचे हस्ते दि. 28 डिसें. रोजी स. 11 वा.झाले.आपल्या उदघाट्नपर भाषणात शेतकऱ्यांचे हित आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्याला आपण अधिक प्राधान्य देतो, म्हणूनच आनंदगीर फार्मर प्रोड्यूसर कंपनी सुरु करण्याला हातभार लावला, असे प्रतिपादन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते नामदेवराव केशवे हे होते, तर जि. प. चे माजी उपाध्यक्ष समाधान जाधव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्तराव मोहिते,प्रा. राजेंद्र केशवे,भाजपाचे शहराध्यक्ष गोपू महामुने, डॉ. निरंजन केशवे,हाजी उस्मानखान पठाण,मारोती रेकूलवार,किशोर जगत, फिरोज पठाण आदींची प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांचे हस्ते गोपू महामुने यांनी प्रकाशित केलेल्या नववर्षाच्या दिनदर्शिकेचे विमोचन करण्यात आले.
पुढे बोलतांना आमदार.भीमराव केराम म्हणाले की, समाज व शेतकऱ्यांच्या हितासाठी ज्या ज्या गोष्टी करणे शक्य आहे, त्याचा पाठपुरावा करून त्यांना सुविधा पुरविण्याचा प्रयत्न अशा कंपनीच्या माध्यमातून केला जाणार आहे. लांजी येथील कंपनी देखील लवकरच सुरु होईल, अशी ग्वाही देऊन अशीच कंपनी कुपटी व वानोळा भागात सुरु करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन करून कंपनी थाटणाऱ्यांना सर्वोतोपरी मदत केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. आपल्या प्रास्ताविकातून प्रा. राजेंद्र केशवे यांनी शासनाने नाफेड मार्फत शेतकऱ्यांच्या माल खरेदी करून त्यांना हमी भाव तर दिलाच आहे, शिवाय खाजगी व्यापाऱ्यांकडून होणारी पिळवणूक व फसवणूक सुद्धा टाळली असे उद्गगार काढून या कंपनीला परवानगी मिळवून दिल्याबद्दल आ. भीमराव केराम यांचे आभार मानले. यावेळी दत्तराव मोहिते, किसन राठोड,समाधान जाधव व नामदेवराव केशवे यांचीही मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांच्या हित साधण्यासाठी कंपनी सुरु केल्याबद्दल आ. भीमराव केराम यांनी कंपनीचे मालक बाळासाहेब देशमुख शिऊरकर यांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शेतकऱ्यांसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते. सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन अशोक सोळंके यांनी केले.

