
नायगाव :
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नायगाव तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे.सोमवारी पहाटे तीन ते चार या दरम्यान मोठा पाऊस झाला. विशेषतः मांजरम भागात ढगफुटी सदृश्य पावसाच्या अतिवृष्टीमुळे परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. नदी-नाल्यांनी रुद्ररूप धारण केल्याने अनेक ठिकाणी नाले फुटून शेतात पाणी शिरले असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मुग, उडीद यांसारख्या खरीप हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांनी पिकांच्या देखभालीसाठी घेतलेली मेहनत व खर्च पाण्यात गेल्याने त्यांच्या डोळ्यांसमोर उघड्यावरती संकट उभे राहिले आहे. अनेक शेतजमिनींवर अजूनही पाणी साचलेले असून पिके सडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
तालुक्यातील नरसी, बरबडा,नायगाव,कुंटूर,देगाव, आदी गावाच्या परिसरात अनेक गावातशेतात व रस्त्यांवर पाणी आल्याने वाहतूकही विस्कळीत झाली आहे. गावोगावच्या संपर्क मार्गांवर अडथळे निर्माण झाल्याने ग्रामस्थांना हालअपेष्टा सोसाव्या लागत आहेत.
शेतीचे प्रचंड नुकसान झाल्याने याबाबत शेतकऱ्यांकडून शासनाकडे तातडीने मदत आणि नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी होत आहे. प्रशासनाने तातडीने पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते.
नायगाव तालुक्यातील मांजर,नर्सी ,बरबडा सकर्ल चे पाणी कुंटूर ओढ्यात येतं आसल्याने समोर गोदावरी नदी भरुन आसल्याने ते पाणी मागेच थांबुन कुंटूर मधील शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली जात आहे शेतकऱ्यांचे ओढ्या काठची शेती पुर्ण शेती पाण्याखाली जात आहे.

