
नायगाव : बाळासाहेब पांडे
महसूल प्रशासनाचे काम अधिक परिणामकारक आणि लोकाभिमुख व्हावे यासाठी सर्व महसूल कर्मचारी अधिकारी यांनी प्रयत्न करूनशासनयोजनांच्या अंमलबजावणीस गती द्या – उपजिल्हाधिकारी कल्पना डोंबे यांचे आवाहन केले.नायगाव येथे नुकतीच झालेल्या तलाठ्यांच्या आढावा बैठकीत उपजिल्हाधिकारी कल्पना डोंबे यांनी महत्त्वपूर्ण सूचना व आवाहन केले. अधिकारी व तलाठ्यांना शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी गांभीर्याने करण्याचे हीनिर्देश दिले.
उपजिल्हाधिकारी कल्पना डोंबे यांनी विशेषतः गावनिहाय मालमत्ता पत्रकांचे अद्ययावत तपशील वेळेवर पूर्ण करण्यावर भर देताना, यामध्ये कोणतीही ढिलाई खपवून घेतली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. महसूल विभागात पारदर्शकता राखणे, नागरिकांच्या तक्रारी वेळेत निवारण करणे, व गावपातळीवर नियमित उपस्थित राहून ग्रामस्थांच्या अडचणी समजून घेणे ही तलाठ्यांची प्राथमिक जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
या बैठकीस बिलोलीचे तहसीलदार गजानन चव्हाण, नायगावचे तहसीलदार डॉ. धम्मप्रिया गायकवाड, तसेच विविध विभागांचे अधिकारी व सर्व तलाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत महसुली नोंदींच्या अद्ययावत कामावर विशेष भर देण्यात आला. तसेच जलयुक्त शिवार, पिक विमा योजना, डिजिटल नकाशे, इत्यादी महत्त्वाच्या शासकीय उपक्रमांबाबत तलाठ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

