
माहूर – : “शाळेत पाठवा, शाळेत पाठवा, आपली मुले शाळेत पाठवा!” हा एकच नारा देत माहूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, टाकळी नवी येथील विद्यार्थ्यांनी संपूर्ण गाव दणाणून सोडले. १००% पटसंख्या (हजेरी) हे मुख्य उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून शाळेने या अनोख्या उपक्रमाचे आयोजन केले होते. माहूर तालुक्यात अशा प्रकारे चौकाचौकांत विषयनिहाय प्रदर्शन भरवणारी ही पहिलीच शाळा ठरली आहे.
चौकाचौकांत ज्ञानगंगा: या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रदर्शनासाठी एका जागी स्टॉल्स न लावता, गावातील वेगवेगळ्या चौकांमध्ये वेगवेगळ्या विषयांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी त्या-त्या चौकात जमलेल्या नागरिकांना विषयांची माहिती दिली:
गणित विषय: धमप्रिया घाळवट .; हिंदी विषय: परिणीती कांबळे .;भूगोल विषय: तन्वी बेंद्रे.; मराठी व इंग्रजी: कु. जान्हवी भगत.; विज्ञान: समर्थ चिवटे व जान्हवी भगत.;इतिहास: दिव्यांका खाडे.
राष्ट्रगीताने सुरुवात आणि सामाजिक भेळ: कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक राष्ट्रगीताने करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी गावातून रॅली काढत पालकांना आपल्या पाल्यांना नियमित शाळेत पाठवण्याचे आवाहन केले. उपक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ‘सामूहिक भेळ’ तयार केली. विद्यार्थ्यांमध्ये सहकार्य आणि आनंदाने शिकण्याची वृत्ती जोपासणे हा यामागचा मुख्य हेतू होता.
मान्यवरांची उपस्थिती: यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रुद्रशिल भवरे, डॉ. आनंद अडकिने, राहुल राऊत, तसेच सावित्रीबाई शिक्षण समितीचे सदस्य महेंद्र घालवट, निलेश कांदे, सचिन बियाळे, नामदेव आडे, संतोष गिरी आणि अनंता राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.
वेधले लक्ष महापुरुषांच्या वेशभूषेने: रॅलीमध्ये अपूर्व भवरे (महात्मा फुले), स्वराज कांदे (संत गाडगे बाबा) आणि खुशी घाळवट (सावित्रीबाई फुले) यांनी साकारलेल्या वेशभूषांनी गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.
मुख्याध्यापक चेवटे सर आणि श्री. खोंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वी झाला. १००% हजेरीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी शाळेने घेतलेल्या या परिश्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.



