
नायगाव
जालना जिल्ह्यातील परतूर येथे २५ जून रोजी एका सार्वजनिक कार्यक्रमात भाजप नेते व माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी शेतकरी वर्गाचा कथित अपमान करत केलेल्या वादग्रस्त विधानावरून तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यांच्या वक्तव्याने ‘शेतकरी बाप’ आणि त्याच्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेवर घणाघात केल्याचे सांगत, विविध संघटना आणि सर्वपक्षीय कार्यकर्ते एकत्र येत निषेध आंदोलनाचे आवाहन केले आहे.
हे विधान काय आहे?
बबनराव लोणीकर यांनी बोलताना, “मोदी सरकारने तुझ्या शेतकरी बापाच्या अंगावरचे कपडे, पायातील जोडा, हातातील मोबाईल आणि कुटुंबातील महिलांच्या पेन्शनपासून ते मायचा पगारसुद्धा दिला आहे,” असे वक्तव्य केल्याचे सांगण्यात येत आहे. या विधानाने शेतकऱ्यांच्या स्वाभिमानावर आघात झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
रास्ता रोको आंदोलनाचे आयोजन:या विधानाचा निषेध म्हणून २८ जून २०२५ रोजी सकाळी ११ वाजता डॉ. हेडगेवार चौक, नायगाव येथे शेतकरी पुत्र, सर्वपक्षीय कार्यकर्ते, संघटना व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नायगाव, उमरी, धर्माबाद, बिलोली, देगलूर परिसरातील संघटनांनी हे आंदोलन उभारले आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाचा पुढाकार:
८९ विधानसभा मतदार संघातील प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते गजानन शंकरराव पाटील चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली प्रहार दिव्यांग क्रांती संघटना व इतर शेतकरी संघटनांनी तहसीलदार, जिल्हाधिकारी व मुख्यमंत्री यांना निवेदन दिले असून बबनराव लोणीकर यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा व मानहानीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर इशारा:
जर या प्रकारावर तात्काळ कारवाई झाली नाही, तर न्यायालयाचा मार्ग पत्करावा लागेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
कार्यकारी संपादक : बाळासाहेब पांडे

