
श्रीक्षेत्र माहूर – जयकुमार अड कीने
अश्विन शुद्ध तृतीयेला माहूर येथे आयोजित तिसऱ्या माळेला भक्ती, संगीत आणि नृत्याचा मनमोहक संगम अनुभवायला मिळाला. नांदेड येथील पद्मजा भजनी मंडळातर्फे सादर करण्यात आलेल्या गोंधळी नृत्याने सुरुवातीलाच भक्तांना भुरळ घातली. सकाळी ११ वाजता संजय काण्णव यांच्या हस्ते संगीत रजनीचा शुभारंभ झाला. विजया जामकर यांच्या मार्गदर्शनाखाली पद्मजा भजनी मंडळातील नेहा प्रवीण खडकीकर, प्रेरणा प्रवीण खडकीकर, उर्वशी प्रवीण खडकीकर व नंदिनी पद्मजा जाधव यांनी “ललाटी भंडार”, “आईचा गोंधळ” व “माय भवानी” या गाण्यांवर नेत्रदीपक गोंधळी नृत्य सादर करून रसिक भक्तांच्या टाळ्या मिळवल्या. दुसऱ्या सत्रात माहूर येथील रेणुका महिला मंडळाने भक्तिभावाने गीते सादर केली. केदार नागदेव, रेणुका काण्णव, सीमा जोशी, वृषाली देशपांडे, मंंजिरी काण्णव, शुभांगी आमले, रंजना जगत, राजश्री काण्णव व शीतल केदार यांनी “ये मयुरावरती बसून शारदे”, “गुरुदेवा तुम्ही या हो”, “ये अंबे भजनाला”, “तुला डोईवर घेईन”, “ये गं अंबे घटात बैसाया” व “रेणुका दर्शनाला बाई चालत ये गं” अशी सुरेल व मनोभावे भजने गाऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाच्या शेवटी संजय काण्णव यांनी सर्व कलाकारांचा सन्मानपत्र देऊन गौरव केला. या संगीत रजनीचे सुंदर सूत्रसंचालन निलेश केदार गुरुजी यांनी केले. या कार्यक्रमामुळे माहूर नगरीत भक्तिमय वातावरण अधिकच खुलले असून, उपस्थितांनी कलाकारांच्या योगदानाचे मनापासून कौतुक केले.

