
कुंटूर
येथील वि.जा.भ.ज. महाविद्यालय कुंटूर तांडा, शांतीनिकेतन माध्यमिक विद्यालय कुंटूर आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेगांव येथे महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (MKCL) व सरोजना कंप्युटर एज्युकेशन कुंटूर यांच्या संयुक्त विद्यमाने ए.आय. व सायबर सिक्युरिटी जनजागृती इव्हेंट मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. बाळू दुगडूमवार होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून एम.के.सी.एल. नांदेडचे केशव हंबर्डे व कु. योगेश्वरी कदम उपस्थित होते. सुरुवातीला सर्व मान्यवरांचा सत्कार सरोजना कंप्युटर एज्युकेशन चे संचालक राजेश आडकिणे यांनी शाल व हार घालून केला.
राजेश आडकिणे यांनी या उपक्रमाचा उद्देश स्पष्ट करताना सांगितले की, “आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेची (AI) माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. समाजात या विषयांबाबत जागृती निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.”
कार्यक्रमात केशव हंबर्डे यांनी सायबर सुरक्षा विषयावर सविस्तर मार्गदर्शन करताना फोन सिक्युरिटी, व्हॉट्सअॅप, फेसबुक, फोनपे, नेट बँकिंग, गुगल पे यांसारख्या डिजिटल साधनांचा सुरक्षित वापर कसा करावा याचे प्रात्यक्षिक सादर केले. तसेच फिशिंग, हॅकिंग, बँकिंग फ्रॉड, सोशल मीडिया ब्लॅकमेलिंग, फेक लोन अॅप्स, मालवेअर, क्रेडिट कार्ड फ्रॉड आदी विषयांवर माहिती देत सावधगिरीचे उपाय सांगितले.
दुपारच्या सत्रात जिल्हा परिषद शाळा सातेगांव येथेही हा कार्यक्रम पार पडला. यावेळी शाळेच्या वतीने पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती करणे आणि समाजात या संदेशाचा प्रसार करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे हंबर्डे यांनी सांगितले.
सर्व विद्यार्थी, शिक्षक व उपस्थितांनी कार्यक्रम मन लावून ऐकला. शेवटी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत “तुम्ही समाजातील सायबर जनजागृतीचे वाहक बना,” असे आवाहन करण्यात आले.

