
श्रीक्षेत्र माहूर : जयकुमार अडकिने
अमृतकुंड येथे दत्तभक्तांच्या उपस्थितीत दिनांक 20 जानेवारी 2026 ते 22 जानेवारी 2026 दरम्यान आयोजित करण्यात आलेला तीन दिवसीय नामस्मरण सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात व उत्साहात संपन्न झाला.
या तीन दिवसीय कार्यक्रमाची सुरुवात दररोज सकाळी ६ ते ९ या वेळेत नामस्मरणाने करण्यात येत होती. त्यानंतर ९ ते १० या वेळेत दत्तनामावर आधारित प्रवचन, तर सकाळी १० नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी ३ ते ५ या वेळेत दत्तप्रभूच्या नामाची पोथी वाचन, तसेच सायंकाळी ६ ते ९ या वेळेत पुन्हा नामस्मरण आणि रात्री ९ वाजता कीर्तन असे भक्तिमय कार्यक्रम पार पडले.
या तीन दिवसीय धार्मिक कार्यक्रमासोबतच विविध सामाजिक उपक्रमांचाही समावेश करण्यात आला होता. यामध्ये वनराई बंधारे उभारणी, वृक्षारोपण, तसेच अमृतकुंड परिसराची स्वच्छता करण्यात आली. धार्मिकतेसोबतच पर्यावरण व सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश या उपक्रमांतून देण्यात आला.
कार्यक्रमाची सांगता पुरणपोळी व आंब्याच्या रसाच्या महाप्रसादाने करण्यात आली. अमृतकुंड हे अमृतकुंड दत्त महाराजांचे चरणस्पर्श झालेलं पवित्र कुंड असून येथे साधना केल्यास विशेष आध्यात्मिक अनुभूती मिळते, असे मानले जाते. “राहायचं असेल तर यक्ष-निशब्द बिंदू साक्ष ठेवून, ओम बिंदूवर लक्ष केंद्रित केल्यासच दत्तानंद प्राप्त होतो,” असा संदेश यावेळी देण्यात आला.
कीर्तनातून राष्ट्रसंत साईनाथ महाराजांचे विचार मांडताना, “भक्ती निष्काम असावी. मागणे एकच असावे—‘तुझा विसर कधीही पडू नये’,” असा भावनिक संदेश भाविकांना देण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन जवाहरलाल जैस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. कार्यक्रमास आयोजकांच्या पत्नी सौ. कांचन जवाहरलाल जैस्वाल, भाऊ पाटील, संभाजीनगर विभाग संघचालक बबनराव जमाडे, महागाव नगराध्यक्ष दिलीपराव कोपरकर, शेषराव पाटील,पुंडलिक हुंम्बे सावकार हडसणीकर,तंटामुक्त समिती अध्यक्ष निळू पाटील, नथ्थूपाटील करंजखेड यांच्यासह परिसरातील हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तीन दिवस चाललेल्या या नामस्मरण सोहळ्यामुळे अमृतकुंड परिसर भक्तीरसाने न्हाऊन निघाला असून भाविकांनी समाधान व्यक्त केले.

