
नायगाव बाजार
– सप्तरंगी साहित्य मंडळ आयोजित सहावे जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाच्या मुख्य संयोजक म्हणून कवी जीवन मांजरमकर यांची निवड करण्यात आली असून. ग्रामीण साहित्य क्षेत्रात सतत कार्यरत राहून नव्या लेखकांना प्रोत्साहन देण्याचे आणि ग्रामीण संवेदना जपणाऱ्या साहित्यनिर्मितीस चालना देण्याचे त्यांचे कार्य लक्षात घेऊन ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
संमेलनात ग्रामीण साहित्याची परंपरा, नवे प्रवाह, लोकजीवनाशी नाते आणि समकालीन घडामोडी यांवर विविध सत्रे आयोजित केली जाणार आहेत. मुख्य संयोजक म्हणून मांजरमकर यांचे मार्गदर्शन संमेलन अधिक परिणामकारक आणि सर्वसमावेशक होण्यास उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने आजपर्यंत एकदिवसीय पाच जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलने यशस्वीरीत्या संपन्न झाले आहेत. गोणार (ता.कंधार) जवळा दे. (ता.लोहा) श्रीक्षेत्र माहूरगड, मुदखेड, मातुळ (ता.भोकर) याठिकाणी ही संमेलने आयोजित करण्यात आली होती.सहावे साहित्य संमेलन नायगाव तालुक्यातील मांजरम येथे आयोजित करण्यात आले आहे.
निवडीचे पत्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष रणजित गोणारकर, मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अनुरत्न वाघमारे, राज्याध्यक्ष नागोराव डोंगरे, महिला राज्याध्यक्ष रुपाली वागरे वैद्य, कार्याध्यक्ष प्रज्ञाधर ढवळे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल जोंधळे, जिल्हा सचिव चंद्रकांत कदम आदींची हस्ते देण्यात आले.

