
जयकुमार अडकिने
माहूर : श्री रेणुकादेवी संस्थानावर २०१७ पासून प्रभारी व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेले व्यवस्थापक यांच्याकडून संस्थेच्या घटनेतील अनेक तरतुदींना बगल देत नियमबाह्य व्यवस्थापन होत असल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत. तत्कालीन व्यवस्थापक पी.डी. चव्हाण यांच्या निवृत्तीनंतर कायमस्वरूपी व्यवस्थापक नेमणूक न करता गेल्या आठ वर्षांपासून प्रभारी व्यवस्थापकाच्या माध्यमातून संस्थान चालविण्यात येत असल्याने भाविकांमध्ये नाराजी आहे. संस्थेतील पहिले लेखापाल विनोद सरतापे असूनही कनिष्ठ श्रेणीतील लेखापाल योगेश साबळे यांच्याकडे प्रभारी व्यवस्थापक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील भाविक कुणाल पारशिवणीकर यांनी यापूर्वीच संस्थानवर राजपत्रित अधिकारी व्यवस्थापक म्हणून नेमावा, अशी लेखी मागणी केली होती. संस्थेच्या घटनेतील कलम ९५(५) ला बगल देण्यात येऊन दर पंधरा दिवसांनी साडीपातळ लिलाव करणे बंधनकारक असतानाही तो बंद असून, इतर अनेक नियमांची अंमलबजावणी रखडलेली आहे. यामुळे व्यवस्थापन सुधारण्यासाठी कायमस्वरूपी प्रशासकीय व्यवस्थापक नेमण्याची मागणी भाविक व नागरिकांतून होत आहे. नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या प्रशासकीय विश्वस्तांच्या बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा करून ठोस निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा भाविक व स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

