
नायगाव : बाळासाहेब पांडे
नायगाव तालुक्यात बारावीची परीक्षा शांततेत व कॉपीमुक्त वातावरणात सुरू असून तालुक्यातील ११ परीक्षा केंद्रांवर एकूण ४५७३ विद्यार्थ्यांपैकी ९७ विद्यार्थी अनुपस्थित राहिल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
लातूर विभागीय परीक्षा मंडळाअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील ११२ परीक्षा केंद्रांवर एकूण ४३,२६९ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. नायगाव तालुक्यात ओअॅसिस इंग्लिश स्कूल कुंटूर, जिल्हा परिषद हायस्कूल कुंटूर, जनता कनिष्ठ महाविद्यालय नायगाव, यमुनाबाई उच्च माध्यमिक विद्यालय नायगाव, दत्त कनिष्ठ महाविद्यालय नायगाव,मास्टर दीनानाथ मंगेशकर विद्यालय सोमठाणा, कुंटूर तांडा, बरबडा, धुप्पा, मरवाळी तांडा व नरसी, या केंद्रांवर परीक्षा सुरू आहे.
परीक्षा कॉपीमुक्त व सुरळीत पार पडाव्यात यासाठी भरारी पथक, बैठे पथक तसेच कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिक्षण विभाग, महसूल विभाग, नियोजन विभाग, डायट व पोलीस प्रशासन यांच्या समन्वयातून स्वतंत्र पथके कार्यरत आहेत.
परीरक्षा प्रमुख रेंगुटवार यांचे कार्य प्रशंसनीय
परीक्षा साहित्य वेळेत उपलब्ध व्हावे यासाठी तालुक्यातील सर्व केंद्रांसह बिलोली तालुक्यातील शंकरनगर या एका केंद्रावर रनर व त्यांच्या सहाय्यकांची नियुक्ती करून व्यवस्थित साहित्य पोचण्याची जबाबदारी व्यवस्थित पार पाडण्यात आली आहे. कस्टोडियन व जिल्हा परिषद कन्या शाळेचे मुख्याध्यापक रेंगुंटवार यांनी नियोजनपूर्वक व्यवस्था केल्याने परीक्षा सुरळीत पार पडत आहेत.
महसूल व जिल्हा परिषद अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या
दरम्यान, महसूल व जिल्हा परिषद प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विविध केंद्रांना भेटी देत पाहणी केली. तसेच झूम मीटिंगद्वारेही परीक्षा प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यात येत असून व्यवस्थेबाबत समाधान व्यक्त करण्यात आले.
जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यास व परिश्रमावर भर द्यावा. परीक्षेला प्रामाणिकपणे आणि आत्मविश्वासाने सामोरे जावे. कोणत्याही गैरप्रकाराला बळी पडू नये.”
सुरेश पाटील, गटशिक्षणाधिकारी, नायगाव

