
नायगाव बाळासाहेब पांडे
कलियुगातील प्रत्येक माणूस धावपळीचे जीवन जगत आहे. आपण किती आयुष्य जगलो यापेक्षा आपण किती सत्कर्म केलो आहे. हे तपासून पाहिले पाहिजे. आपल्या देशाच्या रक्षणासाठी पूढे यावे आणि
देव, देश आणि धर्मासाठी आजच्या तरुणांनी पुढाकार घेण्याचे आवाहन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार परमपूज्य हभप महंत समाधान महाराज भोजेकर यांनी केले आहे.
कुंडलवाडी येथील महालक्ष्मी मंदिरात आयोजित कीर्तन महोत्सवात ते बोलत होते.
गेल्या सात दिवसापासून महालक्ष्मी मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, प्रसिद्ध भागवताचार्य हभप कृष्णा महाराज राजूरकर यांची श्रीमद् भागवत कथा, किर्तन महोत्सवासह विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व धार्मिक कार्यक्रमाची सांगता शनिवारी हभप निरंजन भाईजी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. दरम्यान कीर्तन महोत्सवात हभप दत्ताहरी महाराज अंबुलगेकर, हभप श्रीधर महाराज कासराळीकर,हभप मोहन महाराज हासनाळीकर, हभप माऊली महाराज जाहूरकर, हभप सोपान महाराज सानप, हभप संतोष महाराज वनवे यांची कीर्तने झाली. सातव्या दिवसाच्या कीर्तन रुपी सेवेत हभप समाधान महाराज भोजेकर पुढे म्हणाले, आयुष्यात संपत्ती कमवा परंतु कमावलेल्या संपत्तीचा वापर सत्कार्यासाठी लावा. आपल्या जीवनाचा खरा अर्थ काय आहे. हे आपण विसरू नये. संपूर्ण आयुष्य संपत असताना देखील आपण काय चांगले काम केले आहे. हे मात्र कोणीच बघायला तयार नाही.असे सांगून बापाचे महत्त्व पटवून सांगताना मुलींनो पळून जाऊन लव मॅरेज करू नका असा सल्ला दिला.
सध्याचे सरकार हे धर्मनिष्ठ असून राजसत्ता आल्याचा परिणाम काय होतो. हे त्यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले आहे. कारण माऊली ज्ञानोबारायांची जयंती प्रथमच साजरी करण्याचा आदेश काढला. त्याचप्रमाणे राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत आणि पसायदान आता प्रत्येक ठिकाणी गायले जाणार आहे. आपण देवाकडे काहीच मागू नये. कारण देव हा सर्वव्यापी आहे. आपण काहीच न मागता तो आपल्याला देतो. फक्त चांगले कर्म करावे. तसे फळ तो देतोच. विशेषता या संतांनी देवाकडे काहीच मागितले नाही. म्हणून ते संत सर्वश्रेष्ठ ठरले आहेत. सांप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करावा. धर्म कार्य आणि परमार्थात केलेले योगदान कधीच वाया जात नाही. त्याचे फळ आपणास मिळते. असेही त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करताना सांगितले .
…….

