
शिवनिश्चल ट्रस्टची दिवाळी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसोबत
नायगाव : बाळासाहेब पांडे
नांदेड जिल्ह्यातील नायगाव आणि मुखेड तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मदतीचा हात देत शिवनिश्चलन सेवाभावी ट्रस्ट यांनी सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले आहे. सुप्रसिद्ध शिवव्याख्याते व ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. यशवंत गोसावी यांच्या नेतृत्वाखाली या मदत कार्याची सुरुवात झाली.
अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना उभारी देण्यासाठी “शिवविचार कृतीतून व्यक्त व्हायला हवेत” या उद्देशाने ट्रस्टच्या कार्यकर्त्यांनी थेट गावोगावी जाऊन शेतकरी कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू आणि आर्थिक मदत वितरित केली.
या मदत साहित्यामध्ये तेल, पोहे, तांदूळ, बिस्कीटपुडे, चहा, साखर, साबण, टूथपेस्ट अशा घरगुती वस्तूंसह शालेय मुलांना वह्या, पेन, बॅग यांसारखे साहित्य दिले गेले. दिवाळीच्या दिवसांत या घरामध्ये आनंदाचा “मदतीचा दिवा” लावण्याचा हेतू असल्याचे प्रा. गोसावी यांनी सांगितले. या उपक्रमात सौ. पूनमताई गोसावी, गजानन पाटील होटाळकर, माधव पाटील खदगावे, श्याम पा. चोंडे, विजय पा. मोरे, प्रितेश बच्छाव, विवेक सोनवणे, रुद्र गोसावी, साईनाथ बावणे, बालाजी शिंदे आणि बंटी डुमणे या सदस्यांचा सहभाग होता.
शेतकरी अतिवृष्टीने उध्वस्त झाले आहेत आणि आत्महत्याग्रस्त कुटुंबांची अवस्था अतिशय बिकट आहे. अशा कुटुंबांना आधार देण्याचा आमचा प्रयत्न आहे. दिवाळी निमित्ताने आर्थिक मदत, फराळ व जीवनावश्यक वस्तू वाटून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी, यातच शिवनिश्चल ट्रस्टच्या सदस्यांचे समाधान आहे. प्रा. यशवंत गोसावी, अध्यक्ष, शिवनिश्चलन सेवाभावी ट्रस्ट

