
नायगाव तालुक्यातील घुंगराळा ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत वीज वितरण कंपनी महावितरणच्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या निर्णयाला ग्रामस्थांनी ठामपणे विरोध दर्शविला. सरपंच सौ. रुक्मिणीबाई पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या ग्रामसभेत एकमुखी ठराव करून “घुंगराळा गावात स्मार्ट मीटर नको” असा स्पष्ट संदेश महावितरणला देण्यात आला.
या वेळी उपसरपंच वसंत सुगावे पाटील, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावकऱ्यांनी सांगितले की, “पूर्वीचे मीटर सुरळीत कार्यरत असताना आणि वीजबिलही वेळेवर भरले जात असताना, कोणतीही पूर्वसूचना किंवा ग्राहकांची संमती न घेता स्मार्ट मीटर बसविणे हे कायद्याने अनुचित आहे.”
ग्रामस्थांच्या मते, हे स्मार्ट मीटर केवळ चुकीचे बील आकारतातच, शिवाय सामान्य जनतेच्या खिशावर अतिरिक्त आर्थिक बोजा लादतात. “या स्मार्ट मीटरमुळे जुनी बील रक्कम तिप्पट-चौपट झाली आहे. त्यामुळे स्मार्ट मीटर तात्काळ काढून टाकावेत,” अशी ठाम मागणी ग्रामसभेत करण्यात आली.
सुमारे ३०० स्मार्ट मीटर गावात याआधी बसवण्यात आले असून, ते त्वरित हटवावेत, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली. यावेळी महावितरणचे कनिष्ठ अभियंता जाधव व लाईनमन स्वामी यांच्यासमोर ग्रामस्थांनी आपल्या व्यथा ठासून मांडल्या.
संपूर्ण ग्रामसभेचा निर्णय लक्षात घेता, ग्रामपंचायतीच्या वतीने लेखी ठराव महावितरणकडे सादर करण्यात आला असून, घुंगराळा गावात स्मार्ट मीटर न बसविण्याचा ठाम निर्णय घेण्यात आला आहे.

