नायगाव : बाळासाहेब पांडे
नरसीजवळील रामतीर्थ पोलीस प्रशासनाच्या तत्परतेमुळे आणि सायबर सेलच्या तांत्रिक मदतीमुळे किन्हाळा येथील ३२ वर्षीय युवकाचा जीव वाचवण्यात यश आले. सपोनी विक्रम हराळे यांच्या वेळेवर केलेल्या धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
बिलोली तालुक्यातील आनंदा परशुराम उगे हे १० ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजल्यापासून बेपत्ता होते. रात्री उशिरा पर्यंत घरी न आल्याने कुटुंबीय, गावकरी आणि सरपंच विठ्ठल माने यांनी शोध घेतला. मोबाईल फोन लागूनही कॉल न उचलल्याने काळजी वाढली. अखेर रात्री ११:४० वाजता कुटुंबीयांनी रामतीर्थ पोलीस स्टेशनला धाव घेतली.
सपोनी विक्रम हराळे यांनी ही बाब गांभीर्याने घेत सायबर सेलची तात्काळ मदत घेतली. अवघ्या २० मिनिटांत मोबाईल लोकेशन शोधून नांदेड–देगलूर महामार्गावरील धुपा–किन्हाळा रस्त्याच्या कडेला युवक गंभीर जखमी व बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याला तत्काळ वैद्यकीय उपचारासाठी हलवण्यात आले असून प्रकृती आता स्थिर आहे.
ही वेळेवरची कारवाई आणि तांत्रिक मदतीचा अचूक वापर यामुळे एक अमूल्य जीव वाचवला गेला. या घटनेमुळे पोलीस दलावरील जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.

