
नायगाव पळसगाव व टाकळगाव येथील शेतकऱ्यांनी लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच तहसीलदार नायगाव यांना निवेदन सादर करून जुन्या बंधाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीबाबत कारवाई करण्याची मागणी केली आहे. अतिवृष्टीत शेतकरी मोठ्या संकटात सापडले असून, हा जुना बंधारा तात्काळ पाडावा तसेच पूरग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी, असे निवेदनात नमूद केले आहे. २८ ऑगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे पळसगाव, टाकळगाव व परिसरातील शेतकरी हवालदिल झाले. जुन्या बंधाऱ्यात पाणी व कचरा अडल्याने शेतांमध्ये पूर ओसंडला. या पुरामुळे शेतीतील सुपीक माती वाहून गेली असून, शेतात वाळू, गिट्टी व दगडांचा थर साचला आहे. परिणामी जमीन शेतीयोग्य राहिलेली नाही. शेतकऱ्यांना पुन्हा जमीन तयार करण्यासाठी मोठा खर्च करावा लागत आहे. निवेदनात शेतकऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, जुन्या बंधाऱ्याचा कोणताही उपयोग नाही. कारण त्याच्या खालच्या बाजूस मोठा पूल बांधून पूर्णत्वास गेला असून त्यावर वाहतूक सुरळीत सुरू आहे. त्यामुळे हा जुना बंधारा केवळ शेतकऱ्यांच्या नुकसानीस कारणीभूत ठरत असून नागरिकांसाठीही धोकादायक आहे. म्हणून हा बंधारा तातडीने पाडावा व पूरग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर धोंडीराम इरवंता सुपारे, अरविंद भारतराव शिंदे, नामदेव आनंदा शिंदे, आनंदा नामजी शिंदे, भारत माणीका शिंदे, कैलास केशवराव ताटे, बाबुराव मदन ताटे, पांडुरंग ईश्वर माने, माधव प्रल्हाद कवटिकवार, चंपत संभाजी दुगावे, अविनाश विठ्ठल कवटिकवार, माधव शंकर ताटे, बाबाराव व्यंकटराव ताटे, गजानान धोंडीराम सुपारे, विलास पांचाळ, शंकर गोविंदराव सुपारे, उमाकांत माधवराव कुरे, गणपती संभाजी दुगावे, पंढरी जगजेराव ताटे, रंजीत मदन ताटे यांच्यासह शंभरहून अधिक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

