
माहूर : जयकुमार अडकिने
जि.प.पं.स. निवडणुकांचे पडघम वाजण्यास जोरदार सुरवात झाली असून दररोज अनेक नवे नवे इच्छुक निवडणूक लढविण्यासाठी चाचपणी करताना दिसत आहेत. गेल्या १० वर्षापासून गोर सेना या समाजिक संघटनेच्या माध्यमातून शेतकरी, कष्टकरी व सामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नाची सोडवनुक करण्यासाठी तालुकाभर विविध प्रकारची आंदोलने करून तालुक्यात एक लढवय्या व अभ्यासू कार्यकर्ता म्हणून ओळख निर्माण केलेले ईवळेश्वर येथील रहिवाशी गोर सेनेचे माजी तालुकाध्यक्ष प्रफुल जाधव यांनी आपला मोर्चा वाई बा. या सर्वसाधारण असलेल्या जि.प. गटाकडे वळविला असून जि.प. गटात गावे, वाडी, तांडे, गुडयांत भेटी गाठी सुरु करून आपण निवडणूक रणसंग्रामातील एक शिपाई असल्याचा संदेश दिला आहे. प्रफुल जाधव यांनी गोर सिकवाडीचे मुखिया स्व. काशिनाथ नायक यांचा विचाराने प्रभावित असल्याने शेतकरी, कष्टकरी लोकांच्या न्यायासाठी गोर सेनेच्या माध्यमातून विविध आंदोलने करून सर्वसामान्य नागरिकांची सेवा गेल्या १० वर्षापासून सातत्याने करीत असल्याने व सदैव डोक्यावर बर्फ जिभेवर साखर घेऊन फिरणारा युवा नेता असल्याने तसेच सर्वधर्मसमभाव माननारा कट्टर पुरोगामी विचाराचा तरुण असल्याने तालुक्यात बंजारा समाजासह सर्वच जातीतील व धर्मातील नागरिकांशी सलोख्याचे संबध निर्माण झालेले असल्याने वाई बा. जि.प. गटातील सर्वच जाती धर्मातील मतदारांकडून वाई बा. जि.प. गटात निवडणूक लढवावी असा आग्रह करण्यात येत आहे.
माहूर शहरातील वसंतराव नाईक यांच्या नियोजित स्मारकाची जागा आरक्षित करणे, शेतकरी बांधवांचे प्रश्न कोणत्याही सर्वसामान्य नागरिकावर अन्याय होत असले तर गोर सेनेचे युवा नेते प्रफुल जाधव यांनी बुलंद आवाज उठवून न्याय मिळवून देतो, अशी त्यांची ख्याती आहे. त्यांनी आजवर अनेक अन्यायग्रस्त नागरिकांना न्याय मिळवून दिलेला असल्याने व सदैव जनसेवेसाठी तत्पर असलेला सर्वसामन्य नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करून लोकशाही मार्गाचा अवलंब करून आंदोलने उभारून न्याय मिळवून देण्याचे काम सातत्याने करीत असल्याने विशेषतः तरुण वर्ग त्यांचेकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच जि.प. मध्ये आपला प्रतिनिधित्व करणारा नेता असा असावा अशी गटातील अनेक गावात चावडी पारावर चर्चा होत असल्याचे दिसून येत आहे.
वाई बा. जि. प. गटात बंजारा समाजाची ७ हजार ५००, आदिवासी ६ हजार मराठा ४ हजार , मुस्लीम ४ हजार ५००, दलित २ हजार ५०० व ना.मा.प्र. व इतर १४ ते १५ हजार अशी मतदारसंख्या आहे. वाई बा. गटात शिवसेना उबाठा गटाकडून ज्योतिबा खराटे, भाजपा कडून डॉ. निरंजन केशवे यांची उमेदवारी निश्चित मानल्या जात आहे. परंपरागत उमेदवार असलेले माजी जि.प. उपाध्यक्ष समाधान जाधव व नवखे शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख सुदर्शन नाईक यांनी आपला मोर्चा वानोळा जि. प. कडे वळविला असल्याचे दिसून येते.
वाई बा. जि.प. गटात शिवसेना उबाठाचे ज्योतिबा खराटे व भाजपाचे डॉ. निरंजन केशवे यांची उमेदवारी निश्चित मानल्या जात आहे. तर कोणत्याही स्थितीती वाई बा. जि.प. गटातून निवडणूक लढविणारच असा चंग बांधलेले प्रफुल जाधव निश्चितच मैदानात असणार असे मानल्या जात असून दोन दिग्जाच्या स्पर्धेत आज तरी तिसरा दिग्गज निश्चित दिसत असल्याने वाई बा. जि.प. गटाची निवडणूक अत्यंत चुरशीची होईल असे मानल्या जात आहे.
तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून तालुकाध्यक्ष अभी. अमित राठोड, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून गुमानसिंग चुंगडे हे इच्छूक आहेत. कॉंग्रेस पक्षाने आपला पत्ता अद्याप खुला केलेला नसल्याने कॉंग्रेस चा उमेदवार कोण राहणार याची उत्सुकता आहे. केशवे घराण्याने कॉंग्रेस पक्ष सोडल्याने कॉंग्रेस पोरकी झाली असे माननारा मोठा वर्ग असला तरी कॉंग्रेस कडून उमेदवारी मिळविण्यासाठी डॉ. सुप्रिया गांवडे, जब्बार शेख, पिंटू पाटील वायफनीकर आदीसह अनेक दिग्गज उमेदवारी साठी इच्छुक असल्याचे सांगण्यात येत आहे. असे असले तरी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्या नंतरच महायुती व महाआघाडी एकत्रित लढणार की स्वतंत्र यावरच कोण कोणत्या पक्षाकडून उमेदवार राहील हे कळणार आहे.

