
नायगाव
कश्मीर मधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ नरसी येथील मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने शुक्रवारी प्रचंड निषेध मोर्चा काढण्यात आला.त्या क्रूर दहशतवाद्याना तात्काळ यमसदनी पाठवा अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.
भारताचे नंदनवन असलेल्या कश्मीर मध्ये पर्यटनास गेलेल्या यात्रेकरुवर 22 एप्रिल रोजी पहलगाम येथील बैसावर पॉईंट वर आतंकवाद्यानी अमानुष गोळीबार केला.या क्रूर हल्ल्यात एकूण 26 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.त्यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा समावेश आहे.या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी नरसीत तमाम मुस्लिम समाजाच्या पुढाकाराने प्रचंड निषेध मोर्चा काढण्यात आला.निषेधाचे फलक हाती घेवून शेकडो मुस्लिम युवक या मोर्चात सहभागी झाले होते.
नरसी चौरस्त्यावरील चारही मार्गावर फिरून येथील पोलीस चौकी समोर मोर्चाचे समापन करण्यात आले.निष्पाप बांधवांना गोळ्या घालणाऱ्या क्रूर दहशत वाद्याना सरकारने तात्काळ यमसदनी धाडावे अशा आशयाचे निवेदन यावेळी प्रशासनास देण्यात आले. या निषेध मोर्चा प्रसंगी रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

