
नायगाव : बाळासाहेब पांडे
नायगाव तालुक्यात पुन्हा एकदा रविवार व सोमवारच्या रात्री साखर झोपेत असतानाच आकाशाने कहर केला. रविवारच्या दिवसा व मध्यरात्री,पहाटे च्या तीन वाजता झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील अनेक भाग पाण्याखाली गेले. राम मंदिर परिसर, नगरपंचायत समोरील भाग, तसेच परमेश्वर सुंके यांच्या ‘अंकिता किराणा दुकानात’ पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मध्यरात्री अचानक पाणी घरात व दुकानांत घुसल्याने नागरिकांना झोप मोडून बाहेर पडावे लागले. काही ठिकाणी नाले ओसंडून रस्त्यावर आलेले पाणी घरात आणि दुकानांत शिरल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. “सामाजिक कार्यकर्ते मारोती कतुरवार यांनी रात्रभर मदतीसाठी फोन केले, पण प्रशासनाकडून कोणीच मदतीस आले नाही. तीन वेळा नायगाव शहरात अशी परिस्थिती निर्माण झाली, तरी कोणतीच उपाययोजना दिसत नाही,” असे नागरिकांचे म्हणणे आहे. नगरपंचायतीकडून तातडीने पंप यंत्रणा लावून पाणी उपसण्याचे काम सुरू करण्याची मागणी स्थानिक व्यापाऱ्यांनी केली आहे. अनेकांचा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला असून, नायगाव तालुक्यात काही ठिकाणी विशेषता मांजरम भागात विजेचा पुरवठा खंडित झाल्याने अंधारातच नागरिक रात्रभर तडफडत राहिले. दरम्यान, तालुक्यातील काही ग्रामीण भागातही पावसाने कहर केला असून शेतीत पाणी साचल्याने पिकांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.तर काही ठिकाणी सोयाबीनचे ढग पाण्यात वाहून गेले शेळगाव छत्री येथील शेतकरी जयराम रामचद्र सालेगाये यांच्या शेतातील सोयाबीन चां ढग नदी मध्ये वाहून गेला अशी माहिती त्यांनी दिली.
नागरिकांचा प्रश्न — “प्रशासन किती वेळा जागं होणार?” दरवर्षी मुसळधार पावसात नायगाव शहर जलमय होते, पण कायमस्वरूपी निचरा व्यवस्था सुधारण्याबाबत अजूनही ठोस पावले उचलली गेली नाहीत. आता मात्र नागरिक प्रशासनाकडून ठोस आणि तातडीच्या कारवाईची मागणी करत आहेत.

