माहूर- जयकुमार अडकिने
माहूर तालुक्याला तीन बाजूने पैनगंगेचा विळखा असून रेतीच्या बाबतीत ही पैनगंगा सोने की चिडिया ठरली आहे. महसूल विभागाकडून तालुक्यातील रेती घाट अवघ्या ४० लक्ष रुपयात लिलाव करण्यात आले परंतु घाट अद्याप सुरु झाले नाहीत. असे असतांना व लवकरच रेती घाट सुरु होणार असतानाच वाई बा. मंडळात रेती तस्करीने उच्छाद मांडला असल्याचे भयान वास्तविक चित्र आहे.
शासनाकडे कोणताही महसूल जमा न करता मंडळ अधिकारी व संबधित तलाठी यांना माया लाऊन त्यांचे छुप्या पाठींब्याने वाई मंडळ अंतर्गत रेती तस्करांनी पैनगंगा नदीतून अवैध उत्खन करून ७ ते ८ हजार रुपये ब्रास दराने विक्री करण्यात येत असल्याने मंडळातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या वाई बाजार सह परिसरातील अनेक गावात रेती तस्करांच्या मनमानी दराने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना लागेल तेवढी रेती रात्रीतून पुरविण्यात येत असल्याचे सर्वत्र दिसत आहे. काही जागरूक नागरिकांनी या बाबत महसूल प्रशासनाकडे माहिती पोहचवली असता महसूल विभागातील काही फितूर कर्मचाऱ्याकडून रेती तस्करांना माहिती कुणी पुरवली याबाबत इत्यंभूत माहिती देऊन रेती तस्कर व नागरिकात वाद लावण्याचे कारस्थान करण्यात येत असल्याचे भीषण वास्तव प्रस्तुत प्रतिनिधीस आलेल्या अनुभवावरून उघड झाले आहे.
याबाबत माहूरचे तहसीलदार यांचेशी संपर्क साधला असता “ सदर प्रकरणी योग्य ती चौकशी करून कारवाई करू तसेच वाई बा. च्या मंडळ अधिकारी व गोकुळ सज्जाच्या तलाठी , मदनापूर सज्जाचे तलाठी यांना सूचना दिल्या असल्याचे सांगितले. तरी सुद्धा रेती तस्करी थांबण्याचे नाव घेत नसल्याने कुंपणच शेत खातय तर दाद मागावी कुणीकडे अशी स्थिती वाई बाजार मंडळात निर्माण झाली आहे. याची नांदेड जिल्हाधिकारी व किनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी दखल घेऊन रेती तस्करी प्रकरणी महसूल विभागातील फितूर कोण याचा शोध घेऊन कारवाई करावी व वाई बा. मंडळातील अवैध रेती तस्करीला आळा घालावा अशी मागणी निसर्गप्रेमी नागरिकातून होत आहे.

