
नायगाव :- बाळासाहेब पांडे
“शासकीय शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण व सरकारी नोकरीमध्ये ५०% आरक्षणाची हमी दिल्यास, या शाळांची गुणवत्ता आणि विद्यार्थीसंख्या निश्चितच वाढेल,” असे प्रतिपादन प्रा. डॉ. शंकर गड्डमवार यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नायगाव कॅम्प येथे आपल्या मुलाचा प्रवेश करून देताना केले. गड्डमवार सर हे स्वतः इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेचे संचालक असूनही त्यांनी आपल्या पाल्याचा प्रवेश सरकारी मराठी शाळेत घेऊन समाजापुढे एक प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे. त्यांच्या मते, “सरकारने ‘समूह शाळा’ संकल्पनेऐवजी या शाळांमध्ये आधुनिक सुविधा, अभ्यासासाठी पोषक वातावरण आणि शिक्षकांवर असलेले अशैक्षणिक कामकाजाचे ओझे कमी केले पाहिजे.” ते पुढे म्हणाले की, आज शहरागावात इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांचा सुकाळ झाला आहे. यामध्ये फॅन्सी युनिफॉर्म, टाय-बेल्ट, इंग्रजीतून बडबड गीतांचा गाजावाजा असतो. त्यामुळे सामान्य पालक भ्रमित होतो की माझं मूल कलेक्टरच होणार! पण स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होणाऱ्यांमध्ये मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक आहे, हे वास्तव आहे. गड्डमवार सरांनी ही बाब स्पष्ट केली की, महाराष्ट्रातील शासकीय शाळांमध्ये आता CBSE पॅटर्न लागू केला आहे, तर MPSC- UPSC सारख्या परीक्षा देखील मातृभाषेत देता येतात. मातृभाषेतून विचार मांडण्याची सहजता इतर भाषांमध्ये मिळत नाही. या कार्यक्रमावेळी मुख्याध्यापक श्री. शिवराज साधू व शिक्षक सौ. राहिणी वट्टमवार, सौ. पिंकी हुंडेकर, श्री. संतोष कल्याण, प्रा. प्रणिता मुंडकर उपस्थित होते. तसेच ‘वाऱनेचा वाघ’ साप्ताहिकाचे संपादक सुभाष शंकपाळे व ‘दिव्यमुखेड नगरी’चे संपादक बालाजी नुरुंदे यांनीही कार्यक्रमाला हजेरी लावली.डॉ. गड्डमवार यांच्या या सामाजिक उपक्रमामुळे पालकांमध्ये जनजागृती होऊन मराठी माध्यमातील शाळांकडे पुन्हा वळण्याची सकारात्मक मानसिकता तयार होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. विशेष ठळक मुद्दे:
सरकारी शाळांना ५०% आरक्षण मिळाल्यास विद्यार्थ्यांचा ओघ मराठी सरकारी शाळा कडे वाढेल मातृभाषेतील शिक्षण हे अधिक प्रभावी व टिकाऊ स्पर्धा परीक्षांमध्ये इंग्रजी माध्यमाच्या तुलनेत मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांचे यश अधिक सी बी एस इ पॅटर्न आणि मराठीतील परीक्षा यामुळे सरकारी शाळांची गुणवत्ता वाढली खासगी इंग्रजी शाळांचे फसवे आकर्षण पालकांसाठी भ्रम निर्माण करणारे.
सरकारी मराठी भाषा शाळा वाचवा स्वाभिमान वाचवा गड्डमवार सरांचा हा पुढाकार ही केवळ वैयक्तिक कृती नसून एक सामाजिक चळवळ होऊ शकते. मराठी भाषेचा सन्मान आणि शासकीय शाळांचा विकास ही काळाची गरज असून, यासाठी शासनाने त्वरित पावले उचलली पाहिजेत.सरकारी मराठी भाषा शाळा वाचवून आपला,देशाचा, व राष्ट्राचा स्वाभिमान वाचवन्या साठी प्रयत्न केला पाहिजे

