
नायगाव
नायगाव शहरातील वाढती वाहनांची संख्या, वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष आणि रस्त्यावर बेशिस्तपणे लावली जाणारी वाहने यामुळे शहरात रहदारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. शिवाजी चौक ते हेडगेवार चौक आणि तेथून कोर्टपर्यंतच्या मुख्य रस्त्यावर वारंवार वाहतूक जाम होत असून त्यामुळे अपघात व अनावश्यक त्रास वाढतो आहे.
यासंदर्भात येथील नागरिकांनी नगरपंचायत नायगावचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पोलीस निरीक्षक नायगाव यांना निवेदन दिले असून, बेशिस्त वाहनांवर दंडात्मक कारवाई करावी, अल्पवयीन चालकांवर बंदी घालावी आणि वाहतूक शिस्तीचे काटेकोर पालन व्हावे अशी मागणी केली आहे.
मुख्य मागण्या
रस्त्यावर वाहने बेशिस्तपणे लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई वाहनचालकांकडे परवाना आहे का, याची तपासणी अल्पवयीन व वेगाने वाहन चालवणाऱ्या मुलांवर कारवाई
हेडगेवार चौकात वाहतूक पोलीस नेमणे पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध करणे.
हे निवेदन सेवा निवृत्त प्रा.डॉ. शंकर गड्डमवार, राम पंगे, रा. ना. मेटकर, इंजि. शंकर माळगे, गणपत पवार, बी. एम. गायकवाड, पत्रकार माधव बैलकवाड, मल्हारी तोटरे, प्रदीप गायकवाड आदींसह २५ नागरिकांच्या स्वाक्षरीसह प्रशासनाकडे देण्यात आले आहे.
बेशिस्त वाहतुकीचे दुष्परिणाम प्रदूषणात वाढ: सततचे ट्राफिक जाम व वाहने सुरू ठेवणे यामुळे ध्वनी व वायू प्रदूषण वाढत आहे.
रस्ता अडवणूक: हातगाड्यांच्या विळख्यात सापडलेल्या हेडगेवार चौकामध्ये वाहनांनी आणि फेरीवाल्यांनी अडवलेले रस्ते.
आरोग्यावर परिणाम: अपघात, वेळेत हॉस्पिटलला पोहोचता न येणे, पालकांच्या मनात भीती.
शाळकरी मुलांचे संकट: सुट्टीच्या वेळेस शंभराहून अधिक वाहनांची गर्दी, पायी चालणाऱ्या मुलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह.
नायगावमधील वाहतूक कोंडी ही केवळ असुविधा नसून संभाव्य अपघात व आरोग्य धोक्यांचे कारण ठरू शकते. नागरिकांच्या मागणीनुसार प्रशासनाने त्वरीत उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.

