
नायगांव : बाळासाहेब पांडे
अतिवृष्टीग्रस्तांना सरसकट व विशेष पॅकेजद्वारे मदत द्या –व प्रलंबित मागण्या मान्य करा अन्यथा दिनांक ४ सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी शरद पवार पक्ष नायगाव तालुका यांच्या वतीने करण्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे नायगांवसह जिल्ह्यातील शेती व मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले आहे. तरीही शासनाने कोणतीच मदत केलेली नाही. त्यामुळे जिल्हा “ओला दुष्काळग्रस्त” घोषित करून शेतकऱ्यांना व पीडितांना सरसकट विशेष पॅकेजद्वारे तातडीची मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) तर्फे करण्यात आली आहे.
या संदर्भात तहसीलदारांना दिलेल्या निवेदनावर नायगाव तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर, राष्ट्रवादी किसान सभेचे माजी प्रदेश प्रतिनिधी लक्ष्मणराव भवरे, तालुका सरचिटणीस किरण वाघमारे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
मागण्यांमध्ये – प्रति हेक्टर ५० हजार रुपये मदत, नदी-नाल्यालगत शेतजमिनी खरडलेल्या शेतकऱ्यांना १ लाख, जनावरांची हानी, घरे, गोठे व पिकांचे नुकसान झालेल्यांना मदत, पीकविमा ७५% रक्कम, कर्जमुक्ती तसेच अपूर्ण व दर्जाहीन कामांवरील कारवाई यांचा समावेश आहे.


