
नायगाव : बाळासाहेब पांडे 
देशाचे विरोधी पक्षनेते मा. राहुल गांधी यांनी सुरू केलेली “वोट चोर, गद्दी चोर” ही जनजागृती मोहीम सध्या देशभरात प्रचंड गाजत असून, लोकशाहीचे मूल्य जपण्यासाठी आणि सत्ताधाऱ्यांच्या हुकूमशाहीविरोधात लढा देण्यासाठी या मोहिमेला सर्वसामान्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार या राष्ट्रीय मोहिमेच्या अनुषंगाने आज नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यात खासदार रविंद्र वसंतराव पाटील चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली “स्वाक्षरी अभियान” जोशात पार पडले. या उपक्रमात तालुकाभरातून मोठ्या प्रमाणात नागरिक, कार्यकर्ते आणि विविध समाजघटकांनी सहभाग नोंदवला.
कार्यक्रमास माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, अक्षय यादव क्रांतिवीर (महाराष्ट्र प्रभारी एन एस यू आय सदस्य), सागर साळुंके (प्रदेश अध्यक्ष एन एस यू आय), श्रीनिवास पाटील चव्हाण, विजय पाटील चव्हाण, संभाजी पाटील भिलवंडे, मोहन पाटील धूप्पेकर, संजय पाटील चव्हाण, सूरज पाटील शिंदे तसेच तालुका काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवादल, एनएसयूआयचे कार्यकर्ते, माजी नगराध्यक्ष, नगरसेवक आणि विविध समाजघटकांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्वाक्षरी मोहिमेद्वारे लोकशाही व घटनात्मक मूल्यांचे रक्षण करण्याचा काँग्रेस पक्षाचा संकल्प पुन्हा अधोरेखित करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी देशात निर्माण होत असलेल्या लोकशाहीवरील संकटाचा निषेध नोंदवत नागरिकांना एकत्र येऊन या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले.

