
नायगाव : बाळासाहेब पांडे
मांजरम : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना धीर देण्यासाठी किसान ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष पुरुषोत्तम गावंडे यांनी आज मांजरम येथे मदतीचा हात पुढे करत साडी-चोळी आणि ४० हजार रुपयांचे धनादेश वितरित केले. गावंडे यांनी मागील तीन वर्षांपासून ‘किसान कृतज्ञता कोष’ या उपक्रमांतर्गत स्वतःच्या एक लाख रुपयांच्या निधीतून मदतीची चळवळ सुरू केली आहे. महाराष्ट्रातील विविध वरिष्ठ अधिकारी, पोलीस अधिकारी, मंत्रालयीन कर्मचारी आणि समविचारी मित्रांच्या सहकार्याने हा सामाजिक उपक्रम ग्रामीण भागात पोहोचविण्याचे काम त्यांनी हाती घेतले आहे. विदर्भात राबविल्यानंतर मराठवाड्यातील शेतकरी विधवा भगिनींना ही मदत मिळावी, अशी स्थानिकांची विनंती लक्षात घेऊन सोमवारी सायंकाळी ग्रामपंचायत मांजरम येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आपल्या मनोगतात पुरुषोत्तम गावंडे म्हणाले, “कापूस व सोयाबीन पिकांचे दर घसरले, शासनाची धोरणं शेतकऱ्यांसाठी प्रतिकूल आहेत. सर्व राजकीय पक्षांनी शेतकरी प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे. मात्र समाजातील सुस्थित वर्गाने या विधवा भगिनींच्या पाठीशी एका भावाच्या नात्याने उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे.”. कार्यक्रमाच्या आयोजनात ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला. या वेळी सरपंच रुक्मिणाबाई व प्रतिनिधी रावसाहेब शिंदे, उपसरपंच सौ शेटेवाड व विठ्ठल शेटेवाड, प्रशांत गावंडे, विनायक शिंदे, दिगंबर शिंदे, पोलिस पाटील शिंदे, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब पांडे, मनोज शिंदे, बालाजी माली पाटील, विकास भुरे, साहेबराव जाधव, नारायण माली पाटील, आनंदराव कांबळे, सुरेश पोतदार, आशिष शिंदे, आदी प्रतिष्ठित उपस्थित होते. याप्रसंगी बाजार भरवण्या साठी पुढाकार घेणाऱ्या भास्कर गायकवाड यांचा सत्कार करण्यात आलाबाळासाहेब पांडे, विकास भुरे आणि बालाजी माली पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

