वन विभागाच्या नायगाव तालुक्यातील यंत्रणेने वृक्ष लागवड करण्यात आलेल्या माळाच्या सभोवताली अग्नी प्रतिबंधक चर योग्यप्रकारे खोदली नसल्याने माजंरम भागातील केदारवडगाव,मांजरम, माजंरम वाडी व घुगंराळा माळरानावर आगीच्या घटना वारंवार घडत असताना सबंधित अधिकारी व कर्मचारी या कडे लक्ष देत नसल्याने वन संपदे बरोबरच जंगलातील प्राणी या वनव्यात नष्ट होत असल्याची भिती वन्यजीव प्रेमी नागरिक करीत आहेत.
नायगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात वन संपदा माजंरम,घुगंराळा,धानोरा सह अन्य भागात आहे.या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडे लावून त्यांचे संगोपनासाठी वन विभागाच्या वतीने लाखोचा खर्च केला जातो.विशेष म्हणजे निसर्गाचे प्रयावरण जोपासण्यासाठी विविध झाडांच्या रोपाची निर्मिती ही नायगाव तालुक्यातील अनेक नर्सरी मधून केली जाते.
तालुक्यातील माळावर करण्यात आलेल्या वृक्ष लागवडी नंतर त्याची जोपासना करण्यासाठी वनक्षेत्र पाल,वन रक्षक, वन मजुर यांची नियुक्ती केलेली असते.उन्हाळ्यात लागवड केलेल्या वनसंपदेचे आगी पासून रक्षण करण्यासाठी मार्च महिन्या पुर्वी अग्नी प्रतिबंधक चर (जाळरेक्षा) माळाच्या सभोवताली खोदून घेणे बंधनकारक असते.या बरोबरच शेतकरी धुऱ्यावरचे गवत पेटवून देताना त्यांना त्यांनी पेटवलेला जाळ माळावर जाणार नाही याची दक्षता घेण्यासाठी यंत्रणा उन्हाळ्यात सतर्क ठेवणे गरजेचे असते.पण नायगाव तालुक्यात अशा प्रकारे यंत्रणा सतर्क नसल्याचे या ठिकठिकाणी लागलेल्या आगीच्या घटने वरून लक्षात येत आहे.
नायगाव तालुक्यात माळावर वनवा पेटणार व पसरणार नाही याची दक्षता घेण्यात आली नसल्याने अनेक माळावर आगी लागुन मोठ्या प्रमाणात मौल्यवान वनसंपदा नष्ट होवून जगंलातील प्राण्याचे जिवन संकटात सापडले आहे.या गंभीर प्रकरणाची दखल जिल्हा वन उपसंचालक व वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी घ्यावी व दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्या वर कार्यवाही करावी अशी मागणी केली जात आहे.

