


नायगाव :
जिल्हा बँकेच्या मतदानाचा अधिकार बहाल करण्याच्या ठरावासाठी घेण्यात आलेल्या आमसभेत भिलवंडे समर्थकांचे दोन गट पुन्हा एकदा आमनेसामने आल्याने नरसी येथे १५एप्रिल रोजी वातावरण तणावपूर्ण बनले होते. कडेकोट पोलिस बंदोबस्तात पार पडलेल्या या सभेत मोठा गदारोळ झाला.जाग्यावर ठराव न घेता सभा तहकूब झाली.
नरसी गावातील राजकारणात सक्रिय असलेल्या दोन्ही भिलवंडे गटांमध्ये आधीपासूनच मतभेद होते. त्यातच मतदानाचा अधिकार कोणाला द्यायचा या मुद्द्यावरून वाद अधिकच चिघळला. परिस्थिती इतकी बिघडली की, कोणत्याही नावावर ठराव न झाल्याने सभा निष्फळ ठरली.
सभेदरम्यान काही सदस्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तणाव वाढत गेला. काही वेळासाठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात आली.
या बैठकीला अनेक मान्यवरांसह सुमारे २५० सदस्य व नागरिक उपस्थित होते. मात्र वादामुळे कोणताही ठोस निर्णय तेथे घेता आला नाही. परंतु नंतर सचिवांच्या सही वीणा ठराव दाखल केल्याची माहिती समोर येत आहे.
खा.चव्हाण,कुंटूरकर होटाळकर यांच्या मध्ये ठरावा वरून राजकीय चुरस
नांदेड जिल्ह्यातील नायगाव नायगाव तालुक्यातील सोसायटीच्या ठरावांसाठी १५ एप्रिल ही शेवटची मुदत असल्याने इच्छुकांची धावपळ पहायाला मिळाली. तालुक्यात सेवा सहकारी सोसायटीचे ठराव घेण्यासाठी काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवराज होटाळकर व भाजपचे राजेश कुंटूरकर यांच्यात शेवटच्या दिवसापर्यंत मोठी चुरस लागलीहोती. तरीही कुणालाही अपेक्षित ठराव मिळाले नाहीत, त्यामुळे या तीन नेत्यात लागलेली चुरस पाहता एका जागेसाठी तालुक्यात तिरंगी लढतीची शक्यता नाकारता येत नाही.
सध्या जिल्हा बँकेचे अध्यक्ष संचालक मंडळाचा पाच वर्षाचा कार्यकाळ संपत आल्याने बँकेचे संचालक होण्यासाठी अनेक दिग्गज कामाला लागलेत तालुक्यात ७१ सोसायटी असून, या सोसायट्यांचा ठराव घेण्यासाठी खासदार रवींद्र चव्हाण यांचे काका श्रीनिवास चव्हाण रात्रीचा दिवस करून पायाला भिंगरी बांधून फिरत होते, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर व भाजपचे राजेश कुंटूरकर यांनी एकेक मतदानासाठी चुरस निर्माण करीत कामाला लागले होते. यामुळे काही सोसायट्या मध्ये ठरावासाठी तणाव झाल्याची चर्चा आहे.
नरसी-खैरगाव- सोमठाणा- अलुवडगाव सोसायट्यांत गोंधळ; सचिवांच्या स्वाक्षरीविना ठराव दाखल
नायगाव : जिल्हा बँक निवडणुकीसाठी प्रतिनिधी निवडीत नरसी, खैरगाव, सोमठाणा व अलुवडगाव येथील चार सोसायट्यांचे ठराव सचिवांच्या स्वाक्षरीविनाच दाखल झाल्याची चर्चा रंगली आहे. बैठका कोरम अभावी रद्द झाल्यानंतरही १५ एप्रिल रोजी दबावाखाली प्रस्ताव सादर केल्याचा आरोप असून, दोन्ही गटांकडून परस्पर तक्रारी दाखल झाल्या आहेत.
आमदार पवार यांच्या आलुवडगाव या छोट्या गावात एक मुखी निर्णय न झाल्याने आमदार राजेश पवार यांच्या वर नामुष्कीची वेळ आली असून हा प्रकार म्हणजे दिव्या खाली अंधार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात ऐकावयास मिळत आहे.


