
नायगाव :
नायगाव तालुक्यातील कहाळा बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त भीम जयंती मोठ्या उत्साहात आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून साजरी करण्यात आली. या निमित्ताने तब्बल ३५० विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या व खाऊचे वाटप करण्यात आले.
“सामाजिक जाणिवेचे एक पाऊल” या संकल्पनेतून राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक संभाजी आलेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. तसेच ग्रामपंचायतीचे माजी सरपंच स्व. शिवैके गंगाधर माणिकराव पाटील कहाळेकर यांच्या स्मरणार्थ जिल्हा गुरु गौरव पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक शिवाजी गंगाधरराव पाटील कहाळेकर यांच्या वतीने विद्यार्थ्यांना ही मदत करण्यात आली.
यावेळी प्रमुख वक्ते व सेवानिवृत्त मुख्याध्यापक बालाजी थोटवे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी जीवनचरित्रावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. “अभ्यास इतका करा की ज्ञानसूर्य स्वतः तुम्हाला दिसेल,” असे प्रेरणादायी उद्गार त्यांनी व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांना पुस्तकरूपी भेट देण्याची घोषणाही त्यांनी केली.
मुख्याध्यापक संभाजी आलेवाड यांनी शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी घेतलेले परिश्रम विशेष उल्लेखनीय ठरत असून, शाळेचा परिसर निसर्गरम्य व सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली ठेवण्यात आला आहे. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची संख्या देखील लक्षणीय आहे.
या कार्यक्रमास शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष मधुकरराव उन्हाळे, विठ्ठलराव ताकबिडे, सुरेश दंडवते, संजय कोठाळे, दत्तप्रसाद पांडागळे, व्यंकटराव गंदपवार, प्रल्हाद राठोड, डॉ. वैजनाथ हंगरगे, दिगंबर मांजरमकर, विठ्ठल मुखेडकर, संजय मोरे, मिथुन मंडलेवार, सरपंच सुनील पाटील लूंगारे, डॉ. माधवराव कहाळेकर, नागेश पाटील कहाळेकर यांच्यासह तंटामुक्ती अध्यक्ष, चेअरमन, पोलीस पाटील आणि गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणिवा रुजत असून, शिक्षणासोबतच मूल्यसंस्कारांचीही जोपासना होत असल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले.


