
नायगाव :
मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबई येथील आझाद मैदानावर गेल्या चार दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या या लढ्याला राज्यभरातून पाठिंबा मिळत असून नायगाव येथील मराठा समाजाचे युवा कार्यकर्ते देखील मागील दोन दिवसांपासून सक्रिय झाले आहेत.
याच पार्श्वभूमीवर 1 सप्टेंबर रोजी नायगाव तालुक्यातील मराठा समाजाच्या युवा कार्यकर्त्यांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन 2 सप्टेंबर रोजी नायगाव बंद करण्याची घोषणा केली होती. या घोषणेनुसार आज (2 सप्टेंबर) नायगाव शहरात शंभर टक्के कडकडीत बंद पाळण्यात आला. नायगाव बंद यशस्वी करण्यासाठी सकाळपासूनच युवा कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. शहरातील सर्व व्यापारी, दुकानदार, व्यावसायिक यांनीही स्वयंस्फूर्तीने बंदला पाठिंबा दिला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात युवा कार्यकर्त्यांनी एकत्र येत छोटेखानी सभा घेतली. या सभेत जरांगे पाटील यांच्या उपोषणाला आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्याला नायगावकरांचा ठाम पाठिंबा जाहीर करण्यात आला. सभेतून “आरक्षण आमचं हक्काचं, मिळालंच पाहिजे”, “मनोज जरांगे पाटील जिंदाबाद” अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शहरात पूर्ण दिवस शांततेत व अनुशासित पद्धतीने बंद पाळण्यात आला.शांततेत सर्व पार पडावे यासाठी सकाळ पासूनच पोलिस निरीक्षक संजय मारकड यांनी चोख पोलिस बंदोबस्त लावला होता…
जिल्ह्यातून केवळ खा. रवींद्र चव्हाण यांचाच मराठाआंदोलनाला पाठिंबा.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या छोटेखानी सभेत मराठा सेवकांनी समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, अशी एक मुखी मागणी पुन्हा एकदा केली.यावेळी नांदेड जिल्ह्यातील नऊ आमदार व तीन खासदारांपैकी केवळ खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण यांनीच आंदोलनाला प्रत्यक्ष उपस्थित राहून ठाम पाठिंबा दिला. उर्वरित आमदार-खासदारांनी अजूनही भूमिका स्पष्ट केलेली नसल्याने समाजामध्ये संताप व्यक्त होत आहे अश्या भावना व्यक्त करण्यात आल्या…..


